नवी दिल्ली :- भारताने दहशतवादाविरोधात निर्णायक पावले उचलत पुन्हा एकदा जगासमोर आपली कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय वायुदलाने मंगळवारी पहाटे सुमारे १.३० वाजता पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर अचूक एअर स्ट्राईक केली. ही कारवाई बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करत करण्यात आली. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर योजलेली ही मोहीम अगदी बारकाईने आखण्यात आली होती. वायुदलाच्या लढाऊ विमानांनी सीमोल्लंघन करत तळांवर तंतोतंत हल्ले केले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई केवळ सैनिकी विजय नसून, देशाच्या अस्मितेचा आणि सुरक्षिततेचा निर्धार आहे, असे सुरक्षा सूत्रांनी सांगितले. दहशतवाद्यांना आधार देणाऱ्या शक्तींना हे उत्तर 'निर्बंधांच्या पलीकडे जाऊन' दिले गेले आहे.या मोहिमेमुळे सीमावर्ती भागात दहशतवादी हालचालींना मोठा हादरा बसला आहे. शौर्य, नियोजन आणि राष्ट्रनिष्ठेचा सर्वोच्च नमुना ठरलेली ही कारवाई भविष्यातील धोरणांसाठीही दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
"ऑपरेशन सिंदूर भारताचा निर्णायक प्रहार, पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त"
Hanuman Sena News
0
إرسال تعليق