प्रतिनिधी,
प्रवीण वराडे,
मलकापूर : शहर व परिसरातील वीज ग्राहकांकडून महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत असून, स्मार्ट मीटर बसविणे, वीजबिलातील त्रुटी, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे तसेच कमी-जास्त व्होल्टेजच्या समस्यांबाबत ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत.ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, जुने वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविताना अनेकदा ग्राहकांना पूर्वसूचना दिली जात नाही. तसेच जुने मीटर काढताना त्यावरील अंतिम रीडिंग ग्राहकांना दाखविले जात नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे मीटर बदलण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.तसेच वीजबिलामध्ये चुकीची आकारणी झाल्यास ऑनलाइन तसेच महावितरणच्या कार्यालयात वारंवार अर्ज करूनही बिल दुरुस्ती होत नसल्याचा आरोप काही ग्राहकांनी केला आहे. यामुळे ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.स्मार्ट मीटरबाबतही ग्राहकांमध्ये नाराजी आहे. काही ग्राहकांच्या मते, जुन्या मीटरमध्ये सरासरी ५० युनिट वापर असताना नवीन स्मार्ट मीटरमध्ये ६५ ते ७० युनिटच्या आसपास वापर नोंदविला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत तांत्रिक तपासणी व महावितरणचे स्पष्टीकरण आवश्यक आहे.
दरम्यान, स्मार्ट मीटरला विरोध, दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होणे आणि कमी-जास्त व्होल्टेजच्या समस्यांमुळे ग्राहक त्रस्त असल्याचे चित्र आहे. महावितरणने या तक्रारींची दखल घेऊन स्मार्ट मीटरची तपासणी, वीजबिल दुरुस्ती आणि वीजपुरवठ्यातील समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची पारदर्शकपणे चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Post a Comment